Thursday, August 6, 2020

-२०- गोष्टीवेल्हाळ

 (व्हिक्टर ह्यू मन्रो उर्फ ‘साकी’ च्या ‘The Storyteller’ या कथेचा स्वैर स्वैर अनुवाद)

टळटळीत उन्हाची दुपार होती. अर्थातच त्यामुळे मध्य रेल्वेची महाराष्ट्र एक्स्प्रेस धावत असली तरीही तो डबा तापलेलाच होता. आतली हवादेखील इंजिन सोडत असलेल्या वाफेसारखी धपापत होती. पुढचं स्टेशन, मिरज, यायला अजून एक तास तरी होता. तशी डब्यात इन मीन पाच माणसं होती. एक छोटा मुलगा, एक छोटी मुलगी, एक तिच्याहून छोटी मुलगी, मुलांची मावशी की आत्त्या; आत्त्याच असावी बहुतेक, कोपऱ्यातल्या खिडकीजवळच्या सीटवर बसलेली. आणि हो, त्याच रांगेतल्या, पण दुसऱ्या कोपऱ्यातल्या सीटवर बसलेला एक मध्यमवयीन माणूस. तो काही त्यांच्या नात्यातला वगैरे नव्हता. होता कुणीतरी त्र्ययस्थच. ती तीन मुलं मात्र तो आख्खा डबा त्यांच्याच मालकीचा असल्यासारखी वावरत होती डबाभर. डब्यात आणखी एक प्रवासी होता, एक माशी ! किती हाकलली तरी जात नव्हती खिडकीतून बाहेर. मुलांचं आणि आत्त्याचं संभाषण होत होतं पण अगदी जुजबी, बहुतेक करून आत्याचं ‘नको’ आणि मुलांच ‘पण का?’ अशाच स्वरूपाचं होतं. छोट्या मुलाचा प्रयत्न त्या माशीला हातातल्या उशीचा रपाटा मारून ठार करायचा होता. पण त्या प्रयत्नात सीट आणि उशी, दोन्हीवरची धूळ मात्र उसळत होती. “शिऱ्या, नको रे.” आत्त्या सांगायची.

अखेर एकदा तिनं पूर्ण वाक्यात हुकुम सोडला, “इथं या सगळे. बाहेर बघा बरं खिडकीतून.”

मुलं अनिच्छेनंच खिडकीजवळ आली. मुलानं पहिला प्रश्न केला, “तो मेंढपाळ मेंढ्यांना हाकलून का नेतोय कुरणातनं”

“अरे, तो त्याना भरपूर गवत असलेल्या दुसऱ्या शेतात नेणार असेल.” आत्त्या म्हणाली.

“पण आत्त्या, या कुरणातपण कितीतरी गवत आहे. सगळ्याभर गवतच तर आहे !”

“अरे, दुसऱ्या कुरणातलं गवत इथल्यापेक्षा जास्ती चांगलं असेल. म्हणून.” आत्त्यानं केविलवाणा प्रयत्न केला.

“कशावरून आणि का चांगलं असेल ते याच्यापेक्षा?” दुसरा प्रश्न लगेच हजर होताच.

“ठीक आहे, ठीक आहे. त्या म्हशी बघितल्यात?” दुसरा केविलवाणा प्रयत्न. सगळीकडेच तर गाई नि म्हशी दिसत होत्या पण आत्त्या नवीन काही तरी दाखवत आहोत अशा आविर्भावात बोलली.  

“पण आधी दुसऱ्या कुरणातलं गावात जास्त चांगलं का ते सांग ना.” श्रीरंग उर्फ शिऱ्याचं पालुपद सुरु झालं.

पाचवा प्रवासी असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर आतां आठ्यांचं जाळं दिसायला लागलं. ‘किती कोरडा, सहानुभूती नसलेला माणूस अहे हा !’ आत्त्याच्या मनात विचार आला. दुसऱ्या कुरणातल्या गवताचा प्रश्न कसा सोडवायचा हे मात्र तिच्या डोक्यात येत नव्हतं काही केल्या.

दोन्हीपैकी जास्त छोट्या असलेल्या मुलीनं आपलं मन रमवायला दुसराच मार्ग शोधून काढला. “मामाच्या गावाला जाऊया” हे गाणं मोठ्यानं गायला सुरुवात केली तिनं. ही फक्त पहिलीच ओळ पाठ येत होती तिला. पण आपल्या या अपुऱ्या माहितीचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचं ठरवलं असावं तिनं. ही एकच ओळ ती पुन्हापुन्हा, सुरांची ओढाताण करत, पण अगदी ठामपणानं गात राहिली. माणसाला वाटलं कुणीतरी तिच्याशी पैज लावलीय की ती ही ओळ मोठ्यानं दोन हजार वेळा ‘गाऊ’ शकणार नाही. आणि तो ती पैज हरणार याचीच आता जास्त शक्यता दिसायला लागली होती.

“इकडं या. मी आता गोष्ट सांगणार आहे तुम्हाला.” माणसानं दोन वेळा दृष्टिक्षेप केलेला लक्षात येऊन आत्त्या मुलांना म्हणाली.

मुलं नाखुशीनंच तिच्या जवळ सरकली. गोष्टी सांगण्यात ती वाकबगार आहे असा काही त्यांचा गैरसमज नसावा.

आत्त्यानं हळू, बारीक आवाजात गोष्ट सांगायला सुरुवात केली. मुलं मधूनमधून तिला चीड येण्यासारखे प्रश्न विचारून गोष्टीत व्यत्यय आणत होती. गोष्ट अगदी सपाट, मुलांना कंटाळवाणी वाटेल अशी, एका महा सद्गुणी लहान मुलीची होती. मुलगी अतिशय चांगली, सद्वर्तनी, आपल्या चांगुलपणामुळे सर्वांशी मैत्री जोडणारी अशी होती. एकदा एका उन्मत्त, उधळलेल्या बैलाने तिच्यावर हल्ला केला असताना कित्येक लोक ती चांगली मुलगी असल्यामुळे तिच्या रक्षणाला धावून जाऊन तिला वाचवतात असा गोष्टीचा शेवट होता.

“ती मुलगी सद्गुणी नसती तर लोक तिला वाचवायला गेले नसते का?” दोन छोट्या मुलींपैकी मोठी होती तिनं विचारलं. खरं तर सहप्रवासी माणसाच्याही मनात हाच प्रश्न उमटला होता.

“तसं नाही. गेले असते, पण त्याना ती आवडत नसती तर इतक्या ताबडतोब धावत नसते गेले.” आत्त्यानं गोष्टीचा बचाव केला.

“अगदी बकवास गोष्ट ! इतकी बकवास गोष्ट मी अजूनपर्यंत कधी ऐकली नव्हती.” छोट्यातली मोठी मुलगी उद्गारली.

“मी सुरुवात थोडीशी ऐकली, पण बकवास म्हणून पुढं लक्षच दिलं नाही.” छोटा मुलगा श्रीरंग म्हणाला.

छोट्यातल्या छोट्या मुलीनं काहीच शेरा मारला नाही. कारण तिनं केव्हाच गोष्टीतलं लक्ष काढून घेऊन “मामाच्या गावाला जाऊया” हे धृपद आळवायचं चालू केलं होतं.

“चटकदार अशी गोष्ट सांगणं तुम्हाला जमतंय असं दिसत नाही.” सहप्रवासी म्हणाला. 

“मुलांना समजेलही आणि आवडेलही अशी गोष्ट सांगणं खरंच कठीण असतं.” आत्त्यानं त्या माणसाचा अनपेक्षित शेरा ऐकून कोरडेपणानं आपल्या बचावाचा प्रयत्न केला.

“मला नाही वाटत तसं.” माणूस उत्तरला.

“मग तुम्ही सांगा ना त्याना तशी एखादी चटकदार गोष्ट.” आत्त्यानं आव्हान दिलं.

“हो, हो. तुम्ही सांगाल गोष्ट आम्हाला ?” छोट्यांतल्या मोठ्या मुलीनं विचारलं.

माणसानं सुरुवात केली, “हो. सांगतो ना. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हा एक छोटीशी मुलगी होती, भारती नावाची. अतिशय गोड आणि सद्गुणी मुलगी होती ती......”

मुलांमध्ये उत्पन्न झालेला उत्साह मावळायला सुरुवात झाली. कुणीही सांगत असलं तरी गोष्ट पहिलीसारखीच कंटाळवाणी असणार असं वाटायला लागलं.

“.... सांगितलेली सगळी कामं करायची, नेहमी खरं बोलायची, आपले कपडे स्वच्छ ठेवायची, दूध आवडीनं प्यायची, नियमितपणे अभ्यास करायची, शिवाय ती अतिशय नम्र होती.”

“दिसायलापण सुंदर होती का ती?” छोट्यातल्या मोठ्ठीनं विचारलं.

“अंss... तुम्हां दोघींइतकी सुंदर नक्कीच नव्हती. पण अगदी भयंsकर चांगली होती ती!” माणूस म्हणाला.

अचानक गोष्ट आवडायला लागली मुलांना. कमालीची चांगली असण्याला ‘भयंsकर चांगली’ म्हणायची कल्पनाच अफलातून वाटली होती त्यांना. त्यामुळं आत्त्याच्या गोष्टीपेक्षा या ‘काका’ची गोष्ट खरी धरायला हरकत नव्हती त्या चिमण्या जिवांची.

“इतकी चांगली नाs, की चांगलेपणाबद्दल अनेक पदकं मिळाली होती तिला. आणि ती ती पदकं नेहमी आपल्या फ्रॉकवर लटकवायची. त्यातलं एक पदक होतं आज्ञाधारक असण्याबद्दलचं, दुसरं होतं वक्तशीरपणाबद्दलचं आणि तिसरं होतं सद्वर्तणुकीबद्दलचं ! चांsगली मोठ्ठी होती ही तीन पदकं. त्यामुळं भारती ती पदकं फ्रॉकवर लटकवून चालत असताना एकमेकांवर आपटून छानसा आवाज करायची. गावातल्या दुसऱ्या कुणाही मुलीकडं, किंवा मुलाकडंसुद्धा, इतकी पदकं नव्हती. त्यामुळं सगळ्यांना वाटायचं की भारती नक्कीच अतिशय चांगली मुलगी असणार म्हणून.”

“भयंssकर चांगली !” श्रीरंग म्हणाला.

“हो ना ! सगळे लोक तिच्या चांगलं असण्याबद्दल नेहमी बोलत असायचे. मग तिथला  राजा होता नं? त्याच्या मुलाला म्हणजे राजपुत्राला भारतीबद्दल कळलं. आणि त्यानं ठरवलं की इतक्या चांगल्या मुलीला आपण बक्षिस म्हणून आठवड्यातून एक दिवस आपल्या खासगी बागेत फिरायची परवानगी देऊया. बाग होती एका मोठ्या डोंगरावरच्या वनात. वनही मोठ्ठं होतं नि बागही खूप मोठ्ठी, आणि फार छान होती. त्यामुळं राज्यातल्या इतर कुणालाही बागेत फिरायला सक्त मनाई होती. तरी भारतीला बोलावलं म्हणजे मग हा तर भारतीचा मोठ्ठाच सन्मान होता नं ?”

 “बागेत मेंढ्या होत्या?” श्रीरंगनं विचारलं

 “नाही. तिथं एकही मेंढी नव्हती.”

 “मेंढ्या का नव्हत्या?” श्रीरंगकडून हा प्रश्न लगेच विचारला जाणं साहजिकच होतं.

 आत्त्याला हसू आलंच. पण तिनं ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही.

 “मेंढ्या नसायला तसंच कारण होतं रे,” माणसानं उत्तर दिलं. “त्या राजपुत्राच्या आईला नं एकदा स्वप्नात दिसलं होतं की आपला मुलगा मेंढीच्या धक्का देण्यामुळं नाहीतर डोक्यावर घड्याळ पडून मरणार आहे. म्हणून मग त्या राजपुत्रानं आपल्या बागेत मेंढ्या ठेवल्या नाहीत आणि घड्याळही ठेवलं नाही.”

 आता आत्याबाईला जरासं कौतुक वाटलं.

 “मग तो राजपुत्र मेला का मेंढीमुळं, नाहीतर घड्याळामुळं.” श्रीरंगनं विचारलं.

 “छे. तो अजून जिवंत आहे. तेव्हा ते स्वप्न खरं होणार की नाही याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही रे. हं तर सांगायचं म्हणजे बागेत मेंढ्या नव्हत्या. पण अरे त्यांच्याऐवजी डुकरं मात्र पाळलेली होती हं राजपुत्रानं तिथं. कळपच्या कळप होते डुकरांचे आणि त्यांची छोटी छोटी पिल्लं पळत असायची इकडून तिकडं नि तिकडून इकडं.”

 “कसल्या रंगाची होती ती?”

“पांढऱ्या तोंडाची काळी होती, काळ्या ठिपक्यांची पांढरी होती, सबंध काळी होती, पांढरे चप्पे आणि भुरा रंग असलेली होती, आणि शिवाय पूर्णपणे पांढऱ्या रंगाची पण होती.” इथं गोष्टीवेल्हाळ ‘काका’ मुद्दाम थोडा वेळ थांबला. बागेतली ही श्रीमंती मुलांच्या मनात चांगली ठसवून द्यायची होती त्याला. मग पुन्हा सुरुवात केली सांगायला: “भारतीला मात्र खूप वाईट वाटलं बाग बघून. कारण माहीत आहे? बागेत फुलंच नव्हती कसलीही. तिनं तर आपल्या आईला अगदी डोळ्यात पाणी आणून वचन दिलं होतं की ती राजपुत्राच्या बागेतलं एकही फूल तोडणार नाही म्हणून. तिला तर हे वचन पाळायचंच होतं. पण फुलंच नाहीत त्यामुळं वचन पाळणार कसं?”

“पण बागेत फुलं का नव्हती?”

“कारण डुकरांनी ती खाऊन टाकली होती ना सगळी! माळ्यानं राजपुत्राला सांगितलं होतं, एक तर डुकरं ठेवायची, नाहीतर फुलं ठेवायची; दोन्ही एका वेळी बागेत राहू शकणार नाहीत. राजपुत्राला डुकरं आवडायची. म्हणून मग त्यानं फुलांच्या ऐवजी डुकरं ठेवायचा निर्णय घेतला.”

व्वा. राज्यातल्या इतर लोकांना राजपुत्राचा हा निर्णय तेव्हा मान्य झाला नसेल पण आत्ता या गाडीत मात्र तो खूपच आवडला असं दिसलं.

“आणि बरं का, आणखीन पण चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या बागेत. छोटी छोटी तळी होती आणि त्यात होते सोनेरी, निळे, हिरवे मासे. बाजूला खूप मोठमोठी झाडं होती. त्यांच्यावर सुंदर सुंदर रंगीबेरंगी पोपट बसलेले असायचे, काही विचारलं तर पटकन्  बोलायचे ते. आणि गोड गुणगुणणारे पक्षीही होते. ते त्या काळातली लोकांची आवडती गाणी गुणगुणत असायचे सतत. भारती आता मजेत फिरून बाग बघायला लागली. तिच्या मनात विचार आला, ‘मी जर आत्ता आहे तशी कमालीची चांगली, गुणी मुलगी नसते तर मला ही सुंदर बाग बघायला मिळाली नसती.’ आणि तिनं आनंदानं स्वत:भोवती गिरकी घेतली. त्याबरोबर तिची ती पदक एकमेकांवर आपटून किणकिणली. ‘हो ग बाई, कित्ती सद्गुणी आणि म्हणूनच किती भाग्यवान आहेस तू !’  असंच म्हणाली असतील ती. आणि तेव्हढ्यात, .......”

“काय झालं तेव्हढ्यात?”

“तेव्हढ्यात एक भयंकर क्रूर असा लांडगा आला तिथं. बागेमधल्या एखाद्या डुकराची संध्याकाळच्या जेवणासाठी शिकार करायला म्हणून.

 “कसल्या रंगाचा होता लांडगा?” मुलांनी उत्सुकतेनं विचारलं.

“चिखलाच्या रंगाचा. काळी काळी जीभ आणि हिरवट घारे डोळे. अगदी क्रूर ! बागेत आल्याबरोबर त्याला दिसली ती आपली भारती. तिचा फ्रॉकच इतका स्वच्छ आणि शुभ्र पांढरा होता की अगदी दूरवरूनसुध्दा तो दिसून यायचा.  भारतीचं आता लांडग्याकडं लक्ष गेलं आणि तो आपल्याकडंच बघतो आहे हे लक्षात आल्याबरोबर ती घाबरून गेली. कशाला आपण या बागेत आलो असं वाटायला लागलं तिला. धूम ठोकली तिनं. पण लांडगाही तिच्या मागं लागला, लांब पल्ल्याच्या उड्या घेत तो तिला गाठायलाच आला जवळजवळ. भारती जीवाच्या आकांताने पळत सुटली ती काटेरी झुडपांच्या समूहामध्ये जाऊन पोचली. एका दाट झुडपात कशीबशी शिरून लपली. काटेरी फांद्यांतून तो लांडगा वास घेत घेत तिला शोधू लागला. त्याची जीभ आता बाहेर लोंबत होती, तोंड उघडल्यामुळे टोकदार दात दिसत होते आणि त्याच्या डोळ्यांतून राग जसा काही ओतत होता. भारतीची घाबरून हबेलहंडी उडाली. तिच्या मनात विचार आला, ‘काय म्हणून मला अवदसा सुचली आणि मी इतकी सद्गुणी झाले? नसायला पाहिजे होते इतकी चांगली. म्हणजे मी आज इथं बोलावली न जाता आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते.’

 त्या झुडपाचा स्वत:चाच वास इतका उग्र होता की त्यात त्या लांडग्याला भारतीचा वास काही आला नाही. आणि ते झुडुपही इतके दाट होते की त्यात तिला शोधून काढायला लांडग्याला खूप वेळ लागला असता. म्हणून मग बहुधा त्यानं तिचा माग काढायचा सोडून देण्याचा विचार केला असावा. तिच्यापेक्षा एखादे लुसलुशीत अंगाचे डुकराचे पिल्लूच मिळवलेले बरे असा विचार करून तो लांडगा तिथून जायला निघाला.  लांडगा इतका जवळ असल्याचं जाणवून भारती भीतीनं थरकापत होती. त्यामुळं तिच्या आज्ञाधारकपणाचं पदक सद्गुणांच्या आणि वक्तशीरपणाच्या पदकांवर आपटून आवाज व्हायला लागला. तो आवाज लांडग्यानं ऐकला. जायला निघालेला लांडगा थबकला आणि पुन्हा झुडपात नाक खुपसून भारतीला शोधायला लागला. आता पदकांचा आवाज जवळून ऐकू येत असल्याचं लांडग्याला जाणवलं आणि त्यानं चपळाई करून पंजा मारला. त्याच्या नख्या भारतीच्या पदकांना अडकल्या आणि लांडग्यानं भारतीला खेचून झुडपाच्या बाहेर ओढलं...........”

“मग? पुढं काय झालं? सांगा ना काका.”

“मग काय होणार? लांडग्यानं भारतीला फाडून खाल्लं. दुसरं काय? फ्रॉकच्या चिंध्या, तिचे बूट आणि तिची ती तीन पदकं, बस्स इतकंच उरलं बाकी!”

“आणि मग लांडग्यानं डुकराचं लुसलुशीत पिल्लू पण खाल्लं?” छोट्यातल्या छोटीनं विचारलं.

“छे छे. ती सगळी डुकरं पळून गेली.”

“व्वाव, कित्ती छान ! गोष्ट सुरवातीला कायतरीच वाटली पण शेवट एकदम मस्त !” छोट्यांतली छोटी.

“आजवर मी ऐकलेल्यांपैकी सर्वात छान, अतिशय सुंदर गोष्ट !! छोट्यांतली मोठ्ठी, ठामपणे म्हणाली.

“खरं तर मी ऐकलेली ही एकमेव सुंदर, भयंssकर सुंदर गोष्ट !” श्रीरंग उर्फ शिऱ्या.

नकारघंटा फक्त आत्त्यानं वाजवली, “अत्यंत चुकीची गोष्ट ! मुलांना सांगण्यासारखी अजिबात नाही ! कित्येक वर्षांपासून काळजीपूर्वक आम्ही त्यांच्यात भरत असलेल्या चांगल्या भावनांना सुरुंगच लावलात.”

गाडी मिरज स्टेशनात शिरली.

“तसंही असेल कदाचित”, आपलं सामान गोळा करत असलेला ‘गोष्टीवेल्हाळ काका’ म्हणाला, “पण प्रवासात तुम्ही जे करू शकला नाहीत ते मी केलं. मुलांना तब्बल दहा मिनिटं मी एका जागी खिळून रहायला लावलं ! चला, निघतो आता.”

फलाटावर उतरता उतरता त्याच्या मनात आलं, ‘बिच्चारी आत्त्या! पुढचे सहा महिने तरी ही कार्टी तिला ‘असल्या चुकीच्या गोष्टी’ सांग म्हणून पिडत रहातील.’

*****

Tuesday, August 4, 2020

-१९- भुताला बढती

(लीओ टॉलस्टॉय या महान रशियन लेखकाच्या Promoting a Devil या लघुकथेचे मुक्त मुक्त रूपांतर) 

एका शेतकरी होता. पण होता गरीबच. एक छोटा जमिनीचा तुकडा होता त्याच्या मालकीचा. थोडा भाग टेकडीच्या उतारावरचा आणि थोडा सपाट पाणथळीचा असं होतं त्याचं शेत. त्या दिवशी तांबडं फुटता फुटताच निघाला होता शेत नांगरायला. न्याहारीसाठी कारभारणीनं रात्रीच्या जेवणातला उरलेला भाकरतुकडा आणि कांदा दिला होता. शेतात पोचल्यावर त्यानं अंगातली बंडी काढली तिच्यात ती न्याहारी गुंडाळून एका झुडपात ठेवली आणि बैलाला नांगराला जुंपून कामाला लागला. सकाळचं ऊन तापायला लागल्यावर त्याचा बैल दमला आणि तो स्वत:ही. भूक लागली. तशी त्यानं बैलाला मोकळा करून चरायला सोडून दिलं आणि आपण झुडपाजवळ जाऊन बंडी आणि न्याहारी घ्यायला गेला. 

आधी अंगावरला  घाम पुसावा म्हणून त्यानं बंडी उचलली. न्याहारी काढून ठेवायला गेला तर होती कुठं न्याहारी? भाकरी नि कांदा दोन्ही गायब. बंडी झटकली, इकडं तिकडं बघितलं पण न्याहारी खरंच गायब झालेली. अरेच्या,  गेली कुठं माझी न्याहारी?’ शेतकरी विचारात पडला.

काय आक्रीतच म्हणायचं की,” तो स्वत:शीच पुटपुटला, “आपण तर कुणालाच इथं आलेलं बघितलं नाही. मग कुणी नेली असेल भाकरी? जाऊ द्या झालं. आलं असेल कुणीतरी भुकेलेलं आपलं लक्ष नसताना आणि नेली असेल त्यानं भाकरी भूक लागली म्हणून.

खरं तर  भाकरी नेली होती एका भुतानं. शेतकरी नांगरत असतानाच ते तिथं येऊन झुडपामागं लपलं होतं. उद्देश काय? तर शेतकरी जे अपशब्द बोलेल ते ऐकायचे आणि त्याचं ते पाप आपल्या मालकाला - म्हणजे प्रधान पिशाच्चाला सांगायचं, हे काम होतं त्याचं.

शेतकऱ्याला न्याहारी कुणीतरी नेल्याचं तसं वाईट वाटत होतं खरं. पण जाऊ दे झालं, असेल कुणीतरी भुकेजलेला गरीब बापडा. आपण काही एक दिवस सकाळी भाकरी खायला मिळाली नाही तर मरणार नाही. त्या गरिबाला गरज होती. खाऊ दे. भलं होऊ दे बिचाऱ्याचं.असं म्हणून मग तो जवळच्या झऱ्यावर गेला, पोटभर पाणी प्याला, जरा वेळ सावलीत लवंडला आणि मग उठून पुन्हा नांगर जुंपून कामाला लागला.

भुताची मात्र निराशा झाली. शेतकऱ्याला पाप करायला भाग पाडू शकलं नव्हतं ते. आता सैतानाकडं जाऊन काय सांगणार?

जायला तर पाहिजेच होतं. मग ते प्रधान पिशाच्च्याकडं गेलं आणि आपण कशी ती भाकरी चोरली पण शेतकरी शिव्याशाप द्यायच्या ऐवजी भलं होऊ दे बिचाऱ्याचंकसं बोलला  ते सविस्तर सांगितलं.

प्रधान पिशाच्च रागावलं. म्हणालं, “अरे मूर्खा, त्या माणसानं तुला हरवलं. यात चूक तुझी आहे. कळत नाही तुला? अरे जर सगळेच शेतकरी आणि त्यांच्या बायका अशा प्रकारे वागायला लागल्या तर आपला कारभारच आटोपला ! असं व्हायला नकोय. परत जा आणि कसून प्रयत्न कर. आणि हे बघ, मी तुला तीन वर्षांची मुदत देतो. तेवढ्यात जर तू त्या शेतकऱ्याला मार्गावर आणलं नाहीस तर तुलाच मी देवांच्या पवित्र पाण्यात बुडवून टाकीन. याद राख.

त्या कल्पनेनेच भूत पार घाबरलं. परत पृथ्वीवर जाऊन काय करावं असा विचार करत बसून राहिलं. बराच वेळ डोकं खाजवल्यानंतर त्याला एक अफलातून कल्पना सुचली. स्वत:चं रूप बदलून त्यानं शेतमजुराचं रूप घेतलं आणि त्या शेतकऱ्याकडं जाऊन त्याच्या शेतात मोलमजुरीचं काम मागून घेतलं.

पहिल्या हंगामात त्यानं शेतकऱ्याला शेताच्या पाणथळ भागात मका लावायला सांगीतलं. ते वर्ष कमालीच्या उन्हाळ्यानं भाजून निघालं. पाऊस पडला नाही. बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांची पिकं करपून गेली. फक्त या शेतकऱ्याचं पीक मात्र पाणी मिळाल्यानं भरघोस पिकलं. त्याच्या वर्षभराच्या गरजेपेक्षा जास्त मका पिकला.

दुसऱ्या वर्षी भुतानं शेतकऱ्याला शेतातल्या टेकडीवरील जमिनीत, उतारावर, मका लावायचा सल्ला दिला. ते वर्ष अतिवृष्टी घेऊन आलं. बाकी सगळ्यांची पिकं कुजून गेली पण या शेतकऱ्याचं पीक मात्र पाण्याचा निचरा झाल्यानं तरारून फुलून आलं. कणसांमध्ये चांगले टपटपीत दाणे भरले. त्या वर्षीदेखील गरजेपेक्षा खूपच जास्त मका मिळाला. त्या जास्तीच्या मक्याचं काय करायचं हे शेतकऱ्याला समजेना.

मग त्या भुतानं त्याला मक्यापासून दारू कशी बनवायची ते दाखवून दिलं. शेतकऱ्यानं कडक दारू बनवायला सुरुवात केली. स्वत: प्यायला आणि मित्रांनाही पाजायला लागला.

भुतानं प्रधान पिशाच्च्याकडं जाऊन आपल्या कामाचा सविस्तर वृत्तांत दिला. मागल्या वेळेच्या चुकीची भरपाई पूर्णपणे केल्याची फुशारकीही मारली. प्रधान पिशाच्च्यानं स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करून घ्यायचं ठरवलं. ते शेतकऱ्याच्या घरी स्वत: अदृश्य स्वरूपात गेलं. तिथं शेतकऱ्यानं आपल्या मित्राना दारूपानासाठी बोलावलेलं होतं. त्याची बायको त्या सगळ्यांना दारूचे पेले भरून देत होती. अचानक एकाला भरलेला पेला देताना तो हिंदकळला आणि दारू सांडली. शेतकरी भडकला. बायकोला रागावून ओरडला, “काय गं? आंधळी झालेस का? नीट चालता येत नाही? ही किंमती दारू आहेडबक्यातलं पाणी वाटलं की काय तुला असं भुईवर सांडायलाआं ?”

भुतानं प्रधान पिशाच्च्याला कोपरखळी दिली, “बघितलंत? हाच माणूस होता ना जो आपल्या वाटणीची भाकरी हरवली तरी नाराज झाला नव्हता?”

शेतकरी अजूनही बायकोवर गुरकावत स्वत: दारूचं वाटप करायला लागला. तेव्हा एक गरीब शेतकरी, ज्याला आमंत्रण नव्हते असा, कामावरून घरी परत जाता जाता आत आला. सगळ्यांना हसून नमस्कार करून बसला. शेतीतल्या दिवसभराच्या कामाने थकलेला होता आणि आपल्यालाही घोटभर दारू मिळेल प्यायला अशी इच्छा होती त्याच्या मनात. वाट बघत राहिला. पण घरमालक शेतकऱ्यानं त्याच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि वर पुटपुटला, “कुणीही आगंतुक आला तर मी काय त्याला माझी दारू द्यायची? जमणार नाही.

हे दृश्य बघून प्रधान पिशाच्च्याला आनंद झाला. पण भुतानं डोळा मारून त्याला सांगितलं, “जरासं थांबा. बघा पुढं काय होतंय ते.

आलेले सगळे पैसेवाले मित्र आणि स्वत: शेतकरी भरपूर प्याले आणि एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला लागले. ते सगळं ऐकून प्रधान पिशाच्च आणखीच खुश झालं. भुताला शाबासकी देत म्हणालं, “अरे हे लोक असेच पीत राहिले आणि एकमेकाला नावं ठेवत बसले तर लवकरच त्यांच्या मनावर आपला कबजा होईल.

एवढ्यानं काय होतंय ? अजून पुढं बघा. अजून एक एक पेला रिचवू द्यात, मग बघा कसे वागायला लागतील. आता कुठं कोल्ह्यासारखं लबाडीचं पण सावधगिरीनं बोलतायत. जरा वेळानं मग त्यांच्यातली जनावरं जागी होतील. तेव्हा आणखी मजा येईल.

सगळ्या मंडळींनी आणखी एकेक पेला रिचवला. मग त्यांचं बोलणं मोठ्या आवाजात लांडग्यासारखं आणि शिवीगाळीचं व्हायला लागलं. प्रधान पिशाच्च बघत राहिलं आणि मनोमन खुश होत राहिलं. हे एक नंबरचं काम झालं बघ.

पण भुताची खात्री होती परिस्थिती अजून हाताबाहेर जाणार याची. थांबा, थांबा. याचा कळस व्हायचाय अजून. अजून एक फेर होऊ द्या दारूचा. मग बघा. यांची डुकरंच होतील.

मग पेयपानाचा तिसरा फेर सुरु झाला. आणि सगळेच एकमेकावर लांडग्यासारखं गुरगुरत, दुसऱ्याचं ऐकता अकारण शिवीगाळी करत हातापायीवर येऊन एकमेकाना मारहाण करायला लागले. आपला शेतकरी स्वत:देखील त्यात सामील झाला आणि पिटला गेला चांगलाच.

आता पार्टी संपायला आली. मित्रमंडळी घारी जायला निघाली. कुणी एकेकटे गेले तर कुणी दुसऱ्याच्या खांद्याचा आधार घेत, गळ्यात गळे घालत, ‘तू माजा भाऊ, मी तुजा भाऊअसं बरळत निघाले. शेतकरी त्या सगळ्याना निरोप देऊन बाहेरपर्यंत पोचवायच्या प्रयत्नात स्वत: एका चिखलाच्या खड्ड्यात पडला आणि तिथंच डुकरासारखा लोळत राहिला.

प्रधान पिशाच्चाच्या आनंदाला पारावार उरला नाही.

वारे पठ्ठे !,”  भुताची पाठ थोपटत ते म्हणालं. फार भारी काम केलंस गड्या तू. हे असं अफलातून पेय बनवून तू मागे केलेल्या चुकीचं परिमार्जन केलंस खरं. पण मला सांग हे जे काही पेय आहे त्यात काय काय मिसळलं होतंस तू? मला वाटतंय सगळ्यात आधी कोल्ह्याचं रक्त घेतलं असशील ज्यामुळं ही माणसं लबाड झाली, त्यात तू समभाग लांडग्याचं रक्त मिसळलं असशील, म्हणून ती क्रूर बनली आणि सगळ्यात शेवटी तेवढ्याच प्रमाणात घातलंस डुकराचं रक्त. त्याच्यामुळं त्याचं वागणं डुकरासारखं झालं. होय ना?”

नाही,” भूत म्हणालं. मी असं काहीच मिसळलं नाही. एवढंच केलं की शेतकऱ्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त धान्य मका - कसं मिळेल ते बघितलं. मुळात जनावरांचे गुण माणसाच्या रक्तात असतातच. पण जोपर्यंत त्याला आवश्यक असेल इतकंच धान्य तो पिकवतो तोपर्यंत हे गुण सुप्त असतात. आणि ते सुप्त असतात तोपर्यंत माणूस त्याच्या हरवलेल्या भाकरीसाठी अस्वस्थ होत नाही. पण जेव्हा त्याच्याकडे जास्तीचं धान्य मका - उरतो तेव्हा तो त्यापासून अनावश्यक असे चैनीचे  पदार्थ  बनवून जिभेचे चोचले पुरवायला बघतो. त्याच चोचल्याना मी  मार्ग दाखवला दारू पिण्याचा. आणि मग जेव्हा शेतकऱ्यानं देवाच्या देणगीपासून म्हणजे मक्यापासून दारू बनवाला आणि प्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या शरीरात असलेलं कोल्ह्याच्ं, लांडग्याचं आणि डुकराचं अशी सगळी रक्तं जागी झाली आणि त्यांनी माणसाच्या रक्तावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. माझी शंभर टक्के खात्री आहे, जोपर्यंत माणूस असा नशेचे पेय - दारू - पीत राहील तोपर्यंत तो असा पशूच बनत राहील.

प्रधान पिशाच्च्यानं भुताचं कौतुक केलं, त्याची पूर्वीची चूक माफ केली, आणि शिवाय त्याला भूतभूषणया मानाच्या पदावर बढतीही दिली.

 

 ***



 

 


Friday, April 17, 2020

-१८- हवालदाराची खेळी

[डब्ल्यू डब्ल्यू जेकब्जच्या ‘The Constable’s Move’ या कथेचे मुक्त मुक्त रूपांतर]
 
उत्तर कोलकात्यातील बारासात गाव. बिल्डिंग ब्लॉक्स फॅक्टरीतला कामगार बिधन पाल त्याच्या घरात जेवणाच्या खोलीत बसला होता. पारुलचं, म्हणजे त्याच्या बायकोचं जेवण संपलं नव्हतं. थंडगार पडलेल्या जेवणाचं ताट तसंच टेबलावर होतं, पण ती जागेवर नव्हती. बिधननं तिच्या ग्लासातलं पाणी पिऊन पालथ्या पंजाने ओठ पुसले आणि आरोळी दिली, “पारो, भीतरे आसो, आर खाना खाओ….. शुन, पारो, भितरे आसो, नोई तो आमी दरजा बोन्दो करबो, आर तुमी बाहिरे रोये जाबे. (“पारो  ये बघू आत आता आणि जेवून घे……ए, पारो, ऐकलंस का? चल ये नाही तर मी दार बंद करून टाकीन आणि तू राहशील बाहेर.”)
 
आपल्याच तिरकस बोलण्यावर खूष होऊन बिधन हसला. खिशातून पाकीट काढून एक सिगारेट  शिलगावली आणि बाहेरच्या खोलीत गेला. पारो खिडकीतून बाहेर डोकावत उभी होती शेजारच्या घरात नवा भाडेकरू येणार होता – पोलीस हवालदार सोमेंदु दासगुप्ता – त्याचं फर्निचर गाडीतून उतरवून घेतले जात होते ते बघत.
 
“भीतरे आसो, नोई तो आमी भीतरतेके चिटकरी लागी देबो. तुमी बाहिरे रोय जाबे. प्रोतिबेशीर   जिनिशेर दिके ताकानु ठीक नोई. ओननोई. (“ये आत आता नाही तर मी कडी लावून टाकीन दाराला आतून आणि तू राहशील बाहेरच. असं शेजाऱ्याच्या सामानाकडं निरखून बघणं बरोबर नाही. गैर आहे.”)
 
पारुलबाईनी या धमकीची अजिबात दखल घेतली नाही. खिडकीच्या तावदानाला नाक टेकवून बाहेर बघणं चालूच ठेवलं. आता जाड काच असलेलं एक टेबल काळजीपूर्वक गाडीवरून उतरवून घरात नेलं गेलं. नवा शेजारी हवालदार सोमेंदु दासगुप्ता स्वत: देखरेख करत उभा होता.
 
“आर कोतो जीनिश आशबे भगवान जानेन. मोने होय, एखाने हार्मोनियम ओ आछे.” (“आणखी काय नि किती सामान येणार आहे आहे कोणास ठाऊक ! एखादा पियानोही असेल कदाचित त्यात.”) बिधन एक कटाक्ष टाकत तिरसटपणे बोलला.
 
“आर्रे, शोत्तीई हार्मोनियम आछे. ट्रक थेखे नामाच्छे. ओई देखो ओर पा देखा जातसे. (“अय्या खरंच की. बाजाची पायपेटीच आहे आता उतरवतायत ती. ते काय त्तिचे पाय दिसतायत ट्रकमध्ये.”) पारुल चित्कारली.
 
आता बिधननं स्वत: खिडकीजवळ जाऊन बघितलं. आणि मग म्हणाला, “पारो, आमी शोकाले बोलेचीलाम आमादेर घरेर पुरानो बाक्शो उनादेर उठाने फेले दा ओ. फेलेछो की? (“पारो, मी तुला सकाळी सांगितलं होतं आपल्या घरातली डबडी आणि कबाडसामान त्याच्या अंगणात फेकायला ते फेकलं  होतंस का?”)
 
“हां आमी फेलेछी ! ओखान थेके तीन बाक्शो उठीये निये गेसेन. आमी शुनेछी प्रोतीबेशी उना बऊके बोलेछेन ‘एगुलू आमादेर काजे लाग्बे’ ” (“हो, टाकलं की ! त्यातले तीन डबे त्यानं उचलून घरात नेले. मी ऐकलं, ‘आपल्याला रंगासाठी नाही तर आणि कशासाठी तरी उपयोगाला येतील’ असं त्याच्या बायकोला म्हणाला ते.”) पारुलनं उत्तर दिलं.
 

“हां. ये पोलीसगुलू एबाबे चोरी कोरे, एजान्नोई हार्मोनियम किन्ते पारे. ओन्नेर जीनिश उठानू लोभी मानुशेर काज.” (“हं, अशी चिंधीचोरी करतात म्हणून तर बाजाच्या पेट्या घेऊ शकतात हे असले पोलिसवाले.”) बिधन पुन्हा तिरसटपणाने म्हणाला,  “किंतु, आमी तुमाके बोलेछी पुरानो बाक्शो फेलार जोन्नो. तुमी नूतन बाक्शो केनो फेलेछो? तुमार की ग्यान नाई?” (“दुसऱ्याच्या वस्तू अशा हडप करतात लेकाचे. पण… मी तुला बिनकामाची डबडी टाकायला सांगितली होती. मं तू चांगली कशाला फेकलीस? बिनडोक कुठली!”)
 
पारुलबाईनी काही उत्तर दिलं नाही. ट्रकवाल्यानं काळजीपूर्वक उतरवून हलकेच फुटपाथवर ठेवलेल्या पायपेटीकडे भारावून गेलेल्या नजरेनं बघत राहिल्या. सोमेंदु हवालदारानं सगळ्या बाजूनी तिची पहाणी केली. त्याच्या बायकोनं तेवढ्यातल्या तेवढ्यात तिचं झाकण उचलून बघितलं आणि दोनतीन पट्ट्या दाबून आवाजही काढला.
 
“अशोभ्भ मोहिला,” (“भंपक बया,”) पारुलबाईनी अर्धवट वळून उद्गार काढला.  “भूतनीर हातेर आंगुल देखो ! मोटा गाजोरेर मोतो.” (“सटवीची बोटं बघा कशी जून चरबट गाजरासारखी आहेत ती!”)
 
“पारो, चमत्कारेर कोथा! पुलीसगुला आमादेर मोहल्लाते? आर आमार प्रोतीबेशी होये थाके? ये बोरो ओन्नाई! थामो,  प्रोथोमे आमी घीये हारमोनियम भंगबो. तारोपोरे तार माथा फाटाबो.  दुई दिने एखान थेके चोले जाबे. तुमी देखते थाको.” (“पारो, अग, कहर म्हणजे पोलीसवाल्यानं आपल्या या कॉलनीत, त्यातसुध्दा माझ्या शेजारला येऊन रहावं ? मोठा अपराधच आहे हा. थांब, आधी त्याचा तो पियानो फोडून टाकतो आणि मग त्याचं टक्कुरं. दोन दिवस, बस् दोन दिवसात इथनं पळून जातोय की नाही बघच तू.”) बिधन म्हणाला.
 
“केनो? केनो जाबे?” (“का पण? का जाईल तो?”) पारुलनं विचारलं.
 
“केनो? तुमी देखो. आमी ताके बाचते देबो ना. बारासाते आमादेर मोहल्ला चेरे ओनेक जाएगा खाली थाकते पारे. आमी चाही आमादेर प्रोतिबेशीते केऊ पोलीस ना थाके. (“का? बघशीलच तू, जिणं हराम करून टाकीन मी त्याचं म्हणून. बारासातमध्ये ही वसाहत सोडून दुसरीकडंही कितीतरी जागा असतील रिकाम्या. माझ्या शेजारी नको कुणी पोलीसवाला.”)
 
नंतरचा संपूर्ण आठवडा बिधनचा मेंदू फक्त पोलिसाला कसा हुसकवायचा याचा विचार कर करून हैराण झाला. पोलीसवाला रहायला आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून बिधनच्या अंगणात रोज रिकामी डबडी पडलेली दिसायची. त्याच्या ओळखीचीच होती ती सगळी. मग तीच डबडी पुढचे तीन दिवस या अंगणातून त्या अंगणात अशी ये जा करायला लागली. कधी कधी तर दिवसातून तीनतीनदा असा प्रवास व्हायचा त्यांचा. एके दिवशी संध्याकाळी बिधन बाहेर जाण्याच्या तयारीत बूट घालून  नाड्या बांधत असताना थड्ड असा आवाज करून एक चेपलेली, गंजकी बादली त्याच्या अंगणात पडली. पाच मिनिटांनी हवालदार सोमेंदु दासगुप्ता सूर्यास्त बघायला म्हणून त्याच्या घरातून बाहेर आला तेव्हा बिधननं त्याला खडसावलं तर तो म्हणाला, “मी ऐकला होता बुवा आवाज काही तरी पडल्याचा.”
 
“तूच तर टाकलंस ते.” बिधन गुरगुरला.
 
“नाही बुवा. मी आणि माझी बायको, तिचा धाकटा भाऊ उत्पल नि त्याची बायको आलेत त्यांच्याबरोबर आत चहा घेत बसलो होतो.” सोमेंदुने आरोप नाकारत ठासून म्हटले आणि वर हसत म्हणाला, “खरं सांगू का? तू जर नीट बघितलंस तर दिसेल की ती बादली काही अगदीच टाकाऊ नाही. तुझ्यापुरतं पाणी राहील त्यात.”
 
बिधन चरफडत घरात गेला. बदला कसा घ्यायचा या विचाराने तो बराच वेळ अस्वस्थ राहिला. पारुलकडून काही सुचवलं जाणार नाही हे ओळखून तो मग बाहेर पडला आणि नेहमीच्या मित्रांच्या कंपूकडे गेला. कंपूतल्या सगळ्यांचं मत पडलं की हवालदाराला चांगला धडा शिकवायला पाहिजे, परंतु कोणाकडेही हमखास यशस्वी होईल अशी योजना नव्हती.
 

“चार लोकात त्याचं हसं होईल असं काही तरी करायला पाहिजे, पोलीसवाल्याना आपली अशी कुचाळकी केलेली पसंत पडत नसते.” एक मित्र म्हणाला.
“पण कसं?” बिधननं विचारलं.
“आरे त्यात काय? हजार मार्ग आहेत त्यासाठी.” तो मित्रच बोलला.
“एक तरी सांग ना लवकर.” बिधन.
 
पण कुणाकडूनही काहीच ठोस उपाय सांगितला गेला नाही. पुढचा आख्खा आठवडा बिधननं अस्वस्थतेत घालवला, हवालदाराचा पाणउतारा कसा करता येईल याचा विचार करत. आणि तोपर्यंत त्याच्या अंगणात पडलेली डबडीही पडून राहिली तशीच. हवालदार सोमेंदु मधून मधून त्यांच्याकडं नजर टाकून जायचा.
 
एक दिवशी अचानक खुलून आलेल्या चेहऱ्यानं बिधन पारुलला म्हणाला, “पारो, आज रॉयबाबुर साथे कोथा होयेचिलो. उनी  की बोलेचे? उनी बोलेचे पोलीसगुलो कोनो भालो मानुषेर घरे बिना ओनोमोती चारा आश्ते पार्बे ना.” (“पारो, अगं तो रॉयबाबू भेटला होता आज मला, तो काय म्हणाला माहित आहे? तो म्हणतो की पोलीसवाल्यानं कुणा सभ्य गृहस्थाच्या घरात, बोलावलं असल्याशिवाय, पाउल टाकायचं नसतं.”)
 
“तोबे? तार की? तुमी तो प्रोतिबेशिके आमादेर घरे कोखोनो आस्ते बोलो ना.” (“मग? त्याचं काय? तुम्ही तर शेजाऱ्याला कधीच आपल्या घरात बोलावणार नाही.” चेहरा निर्विकार, मख्ख ठेवून पारुलनं विधान केलं.
 
“पारो, किछु बुद्धी काजे ला गाव! बिना ओनोमोतीते पोलीसगुलू आमादेर घरे आसले, तोबे तार  उपोर सरकारी बावे जीग्गाशा कोरा होबे. तार उपोरे बिपोदा आस्ते पारे” (“पारो, जरा डोकं वापर. न बोलावता आपला शेजारी पोलिसवाला घरात घुसला आपल्या तर त्याच्यावर सरकारी चौकशीला तोंड द्यायची वेळ येईल.”) बिधन तिच्या मख्खपणाची कीव करत म्हणाला.
 
“केनो औनी बिना ओनोमोतीते  आमादेर घरे आसबेन?” (“पण तो कशाला येईल आपल्या घरात न बोलावता?”)
 
“हां अवश्य उनी आस्बेन, तुमी जुरे चित्कार कोरले उनी आश्बेन……तुमार कापड शुकानुर लाठी कोताय?” (“नक्की येईल, तू मोठ्यानं किंचाळलीस तर……… तुझी ती कपडे वाळत घालायची काठी कुठं आहे?”) डोळा मिचकावत बिधन बोलला.
 
“हे भगवान!  तुमी की पागल होयेगेछो?” (“देवा रे, वेडबीड लागलंय की काय तुम्हाला?”) पारुल घाबरून म्हणाली.
 
“शुनो, तुमी निजेर रूमे जाव. आमी लाठी नीये आश्बो, जोरे जोरे गद्दीते मारबो. तुमी शुदू चित्कार कोर्बे, ‘आमाके आर मेरो ना, आर मेरो ना’. तुमार चित्कार शुने हविलदार दौरे दौरे आश्बे तुमाके बचानुर जोंनो. आमी भीतरतेके चीतकारी लागाबो ना. उनी शोहोजबाबे भित्तरे आश्ते पारे. बुझ ते पार छो? (“ऐक, तू आपल्या बेडरूममध्ये जा, मी येईन आणि काठीनं आपल्या गादीवर जोरजोरात फटके मारीन, तू नुसतं किंचाळत ओरडायचं, ‘नको नको, मारू नका, मारू नका’ म्हणत. तुझ्या किंकाळ्या ऐकून हवालदार नक्की धावत येईल तुला वाचवायला. मी बाहेरच्या दाराला आतली कडी नाही लावणार. ढकलल्याबरोबर उघडावं म्हणून. शिरलं काही डोक्यात?”)


पारुलनं विचार करण्यात बराच वेळ घालवला. बिधनचा संयम सुटायच्या बेतात आला असताना अनिच्छेनंच पारुल उठली आणि आत जाऊन काठी घेऊन आली. म्हणाली, “कुथाय मारचो देखे मारो, नोय तो आमारे होत्त्या करबे…… मारार  प्रोथोमे आमादेर मोध्दे किचू झगादा होवा प्रोयोजन?” (“काय बडवताय ते नीट बघून बडवा. नाही तर कराल माझाच खून…… आणि हो, मारायला सुरुवात करायच्या आधी आपल्यात वादावादी व्हायला हवी न?”)
“हा. तुमी आमाके जोर जोरे गाली दिये जाओ.” (“होय तर. तू मला शिव्या देत रहा कचकून कशावरनं तरी.”) बिधन म्हणाला आणि दोघंही मग बेडरूममध्ये गेले.
 
पारुलनं शेजारच्या घराच्या लागून असलेल्या बेडरूममधला कानोसा घेऊन हवालदार आणि त्याची बायको आत असल्याची खात्री करून घेतली आणि मग हळूहळू चढत्या आवाजात बिधनला त्यानं केलेल्या, न केलेल्या चुकांबद्दल नावं ठेवायला सुरुवात केली. एरवी नवऱ्यासमोर आवाज काढू न शकणाऱ्या तिनं मग नवरा, सासू एवढंच नव्हे तर धाकट्या नणंदेचाही उध्दार करायला मागे पुढे पाहिलं नाही. तिच्या त्या कर्कश्श आवाजातली लाखोली ऐकून बिधनला तर खरोखरच तिला फटकावून काढावं असं वाटायला लागलं. पण लगेच भानावर येऊन “चुप कोरे बोशो, नोईतो आमी लाठी दिये मार्बो” (“आता गप्प बसतेस की देऊ दोन तडाखे”) म्हणत त्यानं पलंगावरल्या गादीवर काठीनं तडाखे मारले. पारुल स्वर टिपेला नेऊन किंचाळली मारली, “उरी मा ! हे शोय्तान, तुमी आमार जान निबे ? केऊतो आमाके बचाव. ” (“आयाई ग, हैवाना, जीव घेतोस काय माझा. अरे कुणी तरी थांबवा, थांबवा ह्या सैतानाला.”) बिधन कानोसा घेत हलकेच म्हणाला, “प्रोतिबेशीदेर घरे कोथा शुना जाच्चे.”  (“हालचाल होते आहे ग शेजारच्या घरात.”) पारुलने परत एकदा किंकाळी फोडली, “मोरे गलाम, मोरे गलाम, केऊतो आमाके बचाव.” (“मेले मेले, वाचवा कुणीतरी.”)
 
आणखी थोडं गादीला धोपटल्यानंतर बिधन पुटपुटला, “बहिरा आहे की काय हा पोलीसवाला!”
 
इतक्यात पलिकडून हवालदाराचा आवाज आला, “अरे ए, अरे, गप्प बसव की तिला. केव्हापासून किंचाळते आहे, एक क्षणभरसुध्दा डोळा नाही लागत तिच्या या केकाटण्यामुळं.”
 
बिधननं काठी टाकली आणि पारुलला म्हणाला, “हविल्दार भोयपाच्छे, पारो, आरो जोरे चित्कार कोरो.” (“भेकड आहे. यायला घाबरतोय लेकाचा. पारो, ओरड आणखी जोरानं.”)
 
त्यानं परत काठी हातात घेतली, पारुलनंही पुन्हा पुन्हा केकाटायला सुरुवात केली. पण दमल्यामुळं आता त्यात काही दम राहिला नव्हता. निराश होऊन बिधन तो ‘शंभरटक्के अक्सीर इलाज’ थांबवायचा विचार करत होता इतक्यात धाडकन् बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. “आला वाटतं एकदाचा” बिधन बोलला. खुषीत येऊन दोघांनी परत नाटकाला सुरुवात केली न केली एवढ्यात बेडरुमचा दरवाजा ढकलून कोणीतरी आत आलं. पारुलचा भाऊ होता तो, बिप्लव. आल्याआल्या त्यानं एक जोराचा गुद्दा बिधनच्या पाठीत हाणला आणि त्याला खाली पाडत ओरडला, ”माझ्या बहिणीवर हात उगारतोस? मारशील? मारशील तिला पुन्हा? घे, हे घे.” आणि पुन्हा दोनतीन रपाटे लगावले त्यानं बिधनला. पारुलनं बिप्लवला मागे खेचत थांबायला सांगितलं आणि म्हणाली, “बिपुदा, एठा एकटा नाटोक. आर किछु ना. देखो आमार कुथाओ लागे नी. लागे नी ना ?” (‘बिपुदा, अरे नाटक होतं ते. बाकी काही नाही. बघ, मला कुठं लागलंय का? नाही न?”)
 
“नाटक? नाटक हं?” बिप्लव उद्गारला. बिधननं मग सगळा खुलासा केला.
 

“आजवर मी ऐकलेला सर्वात उत्तम विनोदी किस्सा आहे हा.” हसून हसून डोळ्यात आलेलं पाणी पुसत बिप्लव म्हणाला.
 
“ठीक आहे, ठीक आहे. जा आता तुझ्या घरी.” बिधन गुरकावला.
 
“बिधनदा, मी जातोच आहे. पण बाहेर बरीच माणसं उभी आहेत तमाशा बघायला, आणि कितीतरी घरांमध्ये जाग आलेली दिसतेय त्यांच्या खिडक्यातनं दिसणाऱ्या दिव्यांवरून. बरं झालं काही जखमा न होता आटपलं ते. चला, मी निघतो.” अजून हसू आवरायचा प्रयत्न करत बिप्लव गेला.
 
तो गेल्यानंतर बाहेरचं दार बंद करायला गेलेला बिधन मात्र हवालदार सोमेंदु आपल्या क्लृप्तीला फसला नाही म्हणून खंत करत राहिला. पारुल बेडरूममध्ये गेली ते त्याच्या लक्षातही आलं नाही.
 
“आय भगवान, पालोंगथो भेंगे गेछे.” (“अरे देवा, पलंग तर मोडला की हो.”) पारुल म्हणाली.

“तोय? तुमी मोने कोरो की काटेर पालोंग तुमार मोरोन पर्जन्तो टिके थाकबे? मेझेथे गिये घोमाओ.” (“मग? लाकडी फर्निचर काय तू मरेपर्यंत टिकणार असं वाटतं की काय तुला? चल, खालीच झोप आता.”) आत येत बिधन धुसफुसला. पारुलनं मुकाट्यानं अंथरूण जमिनीवर पसरलं आणि चादर ओढून क्षणार्धात घोरायला लागली.
 
सकाळी जेव्हा कामावर जाण्यासाठी बिधन बाहेर आला तेव्हा त्याला सोमेंदु हवालदार सिगारेट फुंकत अंगणात उभा असलेला दिसला, बिधनचीच वाट बघत असल्यासारखा.
 
“या या बिधनमोशाय, मी रात्री तुमचा आवाज ऐकला काल. काय मोठ्यानं किंकाळ्या येत होत्या हो ऐकायला !”
 
“तुला काय करायचय? नसत्या चांभारचौकशा करू नको.” बिधन तिरसटपणाने बोलला.
 
हवालदारानं बिधनकडं रोखून बघितलं आणि तसंच एकेरीवर येत म्हणाला, “बायको झोडपत होती वाटतं तुला? तसाच किंचाळत होतास. असा मार खाण्यापेक्षा बारासात पोलीस स्टेशनवर येऊन तक्रार कर तिची. मीच असेन तिथं. लॉकअपमध्ये टाकू तिला. काय?”
 
“तक्रार तुझीच केली मी तर काय होईल?” बिधननं हवालदाराला डिवचलं.
 
“दोन महिने, कदाचित तीन महिनेसुद्धा….. तू आत जाशीन, आणि तिथं मी धुलाई करीन तुझी ती वेगळीच.” खंवचट हसत हवालदार बोलला.
 
“शिपुरड्या, तू बाहेर ये मग दाखवतो तुला काय ते.” मुठी वळत बिधननं हवालदाराला धमकावलं.
 
“आलो असतो, पण ते गैरकानुनी होईल. त्यापेक्षा तुझ्या मेव्हण्यालाच बोलावून घे नं. तो वाचवेल तुला बायकोपासून.” हवालदारानं टोमणा मारला आणि हसत हसत आपल्या घरात गेला.
 
बिधन पुटपुटत पुटपुटत कामावर गेला. संध्याकाळी जेव्हा कामावरून परत आला तेव्हा त्याला हवालदार त्याच्या अंगणात पत्र्याची डबडी, दगडगोटे, विटांचे तुकडे वापरून अंगणातली पायवाट नीट करत असलेला दिसला. बिधनला बघून म्हणाला, “तुझ्या बायकोनं सकाळी दिले हे डबे. बरे  उपयोगाला आले. ही वाट छान आखता आली त्यांच्यामुळं.” आणि आपल्या कामात गर्क झाला. काय उत्तर द्यायचं ते न सुचून बिधन फक्त ‘ह्हं’ असा तुच्छता ध्वनित करणारा उद्गार काढून आणि एक सिगारेट पेटवून आपल्या घराच्या दाराला टेकून उभा राहिला. ‘यानं आता फुलझाडं लावावीत इथं,’ त्याच्या मनात विचार आला.

आणि खरंच की, आठवड्याभरात सोमेंदु हवालदाराच्या अंगणात गुलाब, झेंडू, मोगरा अशी वेगवेगळी रोपं लावलेली दिसली. बिधनच्या डोक्यात आता त्या फुलबागेचा विचार घोळायला लागलं.
 
दुसऱ्या दिवशी बिधन सकाळी लवकर उठला आणि ‘शेजाऱ्याची बाग पावसाची वाट बघत असल्यासारखी मरगळलेली दिसते आहे’ असा शेरा पारुलकडं मारून कामावर निघून गेला. कामावर असताना आज त्याचा मूड मनावरचं दडपण उतरल्यासारखा चांगला होता. त्या दिवशी तो कामावरून जरा लवकरच बाहेर पडला. पण घरी न जाता मित्रांच्या अड्ड्यावर जाऊन त्यानं वेळ घालवला. तिथून  तो शहराच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या एका अगदी जवळच्या मित्राच्या घरी गेला. त्याच्याकडंच जेवून मध्यरात्रीच्या सुमाराला तो घराच्या वाटेला लागला.
 
बारासातच्या परिसरात पोचला तेव्हा रात्रीचे बाराचे टोले वाजायला सुरुवात झाली. बारावा टोला वाजून विरतो न विरतो तोच समोर आला सोमेंदु हवालदार.
 
“ए, बिधन,  थांब थांब. मला बोलायचंय तुझ्याशी.” हवालदार म्हणाला.
 
“माझ्याशी बोलायचंय? काय? कशाबद्दल?” – बिधन
 
“माझ्या बागेतल्या फुलझाडाचा सत्यानाश केलंस तू. का?” – सोमेंदु
 
“फुलझाडं?” आपल्याला काहीच समजत नसल्यासारखं दाखवत बिधननं विचारलं, “कुठली फुलझाडं?”
 
“एss…. नाटक करू नकोस. तू काल रात्री माझ्या अंगणात शिरून माझी झाडं उपटून टाकलीस.”
 
“जबान सांभाळून बोल हां, सांगून ठेवतो,” बिधननं बजावलं. “अरे मला स्वत:ला फुलझाडं आवडतात. मग मी असं कसं करेन? पण खरंच तू एवढ्या नीटपणे लावलेली तुझी झाडं मेली? की उगाच माझ्याशी भांडण उकरायचंय म्हणून बोलतोयस?”
 
“अरे वा, काय पण आव आणतोयस निरागसपणाचा! थांब, तुझ्याविरुध्द तक्रार नोंदवून तुला आतच टाकायला लावतो आता.”
 
“हो का? काय रे, मी हे कधी केलं असं तुझं म्हणणं आहे ?” बिधननं प्रश्न केला.
 
“कधी केलंस ते तुलाच माहिती. नक्की वेळ काय ते महत्वाचं नाही.”
 
“नाही कशी? माझ्यासाठी महत्वाचं आहे जाणून घेणं,” बिधन ठासून म्हणाला. “कारण बिप्लव, माझ्या बायकोचा भाऊ काल रात्री आला होता आमच्याकडे मुक्कामाला. रात्रभर तब्येत ठीक नव्हती बिचाऱ्याची. विचार जाऊन त्याला हवं तर, म्हणजे तुझी खात्री होईल मी नाही हे काम केलं ते.”
 
“मी जर पोलिसात नसतो नं तर तुला  असा बेदम चोपला असता की जन्माची अद्दल घडली असती तुला.” हवालदार बोलला.
 
‘अरे, तू पोलिसात आहेस म्हणून, पोलीस नसतास तर, आईशप्पथ, मीच तुझा खून केला असता.” बिधननं सुनावलं.
 

“माझ्या फुलझाडांचा केलासच खून तू……”  सोमेंदु हवालदारानं अचानक बिधनशी  धक्काबुक्की सुरु केली. बिधनचा कोट धरून त्याला खाली पाडलं. आणि मग दोघांची झटापट सुरु झाली ती जवळजवळ दहा मिनिटं चालली. दोघेही जेव्हा दमले तेव्हाच थांबले. बिधनचा कोट फाटला होता आणि त्याच्या डोक्यावरची टोपी चुरगळली होती. नाकातून रक्त येत होतं. सोमेंदुची अवस्थाही तशीच होती. हेल्मेट चेपलं होतं, युनिफॉर्मवर रक्ताचे आणि चिखलाचे डाग पडले होते. दोघानीही एकमेकांकडं बघितलं आणि दोघांची अवस्था सारखीच आहे हे बघून शस्त्रसंधि अंमलात आणायचा निर्णय घेतला.
 
सोमेंदुनं हेल्मेट उचलून घेतलं आणि म्हणाला, “चल निघ, जा माझ्यासमोरून मी माझं मन बदलायच्या आत. नाहीतर परत सुरुवात करीन. आणि लक्षात ठेव, आपल्यात झालेल्या मारामारीबद्दल कुणाकडही एक अक्षरही बोललास ना, तर तू आहेस आणि मी आहे.”
 
“मला वेड लागलेलं नाही जाहिरात करायला.” बिधननं उत्तर दिलं आणि घराच्या दिशेने जायला निघाला.
 
हवालदाराला बडवल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलं होतं, सोमेंदुनं लाईटच्या खांबाखाली उभा राहून युनिफॉर्म ठीकठाक केला, हेल्मेटचा चेप जमेल तितका काढला आणि ते डोक्यावर ठेवून बारासात पोलीस स्टेशनची वाट धरली. युनिफॉर्मची वाट लागलेलीच होती, शर्टाचं दोऱ्याला लोंबकळत असलेलं एक बटन तुटून खाली पडलं ते त्यानं उचलून खिशात टाकलं. गस्तीच्या बीटवरून कुणाही गुन्हेगाराला पकडून न नेण्यातल्या अपयशाची काय सबब इन्स्पेक्टरला सांगायची हा विचारही त्याला आता सतावायला लागला. एवढ्यात कसला तरी गलका ऐकू यायला लागला.
 
हवालदार सोमेंदु जवळजवळ पळतच आवाजाच्या दिशेने निघाला. ‘पोलीस, पोलीस’ अशा आरोळ्या आता स्पष्ट ऐकू यायला लागल्या. एका वळणानंतर त्याला माणसांचा जमाव एका मोठ्या घराच्या फाटकापाशी असलेला दिसला. इतरही काही माणसं त्याच दिशेने जात होती. हवालदार तिथं पोचला.
‘आला, पोलीस आला, उशिरा का होईना, आला खरा.” त्या घराचा मालक छद्मीपणानं बोलला.
 
थकलेल्या सोमेंदुनं फाटकाच्या खांबाच्या  आधाराने दम घेतला. घरमालक पुढं म्हणाला, “ते चोरटे त्याs दिशेने पळाले, तुम्हाला दिसले नसतील ना हवालदारसाहेब?” इतक्यात घराचा दरवाजा कुणीतरी उघडला तेव्हा आतून आलेल्या दिव्याच्या उजेडात सोमेंदुचा अवतार लोकांच्या नजरेत आला.
 
“अरे? तुम्हाला दुखापत झालीय का? काय झालं?” एकानं विचारलं.
 
“होय” धापा टाकत हवालदार सोमेंदु बोलला. आणि आणखी थोडा वेळ मिळावा म्हणून त्यानं आपल्या खिशातून शिटी काढून फुंकली.
 
घरमालकानं जास्ती माहिती पुरवायचा प्रयत्न केला, म्हणाला, “तीन होते साले चोर, त्यातला एक माणूस भक्कमसा होता, त्याला मी ओळखू शकेन पण बाकीच्या दोघांचे चेहरे नाही दिसले.”
 
सोमेंदुच्या तल्लख मेंदूत आता एक कल्पना आली. त्यानं पुन्हा एकदा शिटी जोराने फुंकली. नंतर विचारलं, “काय काय सामान नेलं त्यांनी?”
 
“काही नाही, मला जाग आली आणि माझ्या दरडावण्यामुळं पळाले लगेच.”
 
हवालदारानं एक आवंढा गिळला आणि म्हणाला, “मी आशुतोष घोष रस्त्यावरून येत होतो तर तिघंजण पळत येताना दिसले या केएनसी रोडवरून. संशय आल्यामुळं मी अडवलं त्याना तिठ्ठ्यावरच आणि त्या जाड्या चोराला धरलं. पण मग तिघानी मिळून माझ्यावर हल्ला केला हो. मी झटापट केली त्यांच्याशी पण तिघांपुढे मी एकटा कमीच पडलो ना. मला धरून ढकललं त्यांनी तर रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथच्या दगडावर डोकं आपटून मी बेशुध्द झालो. शुध्द आली तोवर ते तिघेही पळून गेले होते.” इथं सोमेंदुनं हेल्मेट काढून डोक्यावर पडलेली खोक दाखवली. कुणी सहानुभूती दाखवली, कुणी पाठ थोपटली. इतक्यात बारासात पोलीस स्टेशनमधले सबइन्स्पेक्टर ज्योतिर्मोय आणि इन्स्पेक्टर शुभंकर चौधुरी तिथे आले. त्यांनी सोमेंदु हवालदाराची चौकशी केली. सोमेंदुनं परत आपली कथा ऐकवल्यावर इन्स्पेक्टर चौधुरी म्हणाले, “वेल डन, हवालदार दासगुप्ता!  तू पोलीसधर्माला जागून कर्तव्यात कसूर केली नाहीस. आता चौकीवर जा आणि तुझा सविस्तर लेखी रिपोर्ट दाखल कर.”
 

जबर जखमी असल्याची बेमालुम बतावणी करत सोमेंदु मनातल्या मनात त्या तीनही चोराना पोलिसाना न सापडण्यासाठी शुभेच्छा देत बारासात पोलीस स्टेशनकडे गेला. आणि अर्थात, ते पकडले गेले तरी पोलिसाचा जबाब गुन्हेगारांच्या जबाबापेक्षा जास्त विश्वसनीय मानला जाईल याची त्याला खात्री होतीच.
पोलीस स्टेशनमध्येही त्यानं रिपोर्टात आपली ‘कथा’ रंगवून दिली. डोक्याच्या जखमेवर मलमपट्टी, बँडेज इत्यादी सोपस्कार झाल्यानंतर त्याला चार दिवसाची सुट्टी दिली गेली, पुढचे दोन तीन दिवस झाल्या घटनेबद्दल वाच्यता करू नकोस असं सांगण्यात आलं. पण बंगाली दैनिक ‘बर्तमान पत्रिका’ मध्ये ‘बहादूर हवालदार’ या शीर्षकाखाली एक कॉलमभर मजकूराचा लेख छपून आलाच. सोमेंदु मात्र लोकांसाठी ‘संपर्काबाहेर’ राहिला.
 
बिधननं दैनिक बर्तमान पत्रिकाचा तो अंक पाहिला आणि लेख वाचला, परत परत वाचला. काहीतरी गोम आहे यात असं त्याला ठामपणे वाटलं. पण विचारणार कुणाला? हवालदाराचं घर तर बंद होतं. बिधनची उत्सुकता तर अस्वस्थतेत रूपांतरित झाली. आणि मग आठवड्यानंतर जेव्हा त्याला सोमेंदु हवालदार अंगणात आलेला दिसला तेव्हा घाईघाईनं मधल्या कुंपणावरून डोकावून त्याला तिरसट आवाजात विचारलं, “कसली घरफोडी होती रे?”
 
“अरे वा. सुप्रभात बिधन पाल. काय म्हणतोस?”
 
“घरफोडीचं काय? चोरांशी झटापट केलीस म्हणे तू?”
 
“का? तुला काय वाटतंय? खोटं आहे ते?”
 
“नक्कीच! चोर तुला दिसले यावरच माझा विश्वास नाही.”
 
सोमेंदु उठला आणि शांतपणे म्हणाला, “बिधन, जा. बऱ्या बोलानं घरात जा तू.”  पण बिधनला आता खुमखुमी आली होती पुन्हा भांडण उकरून काढायची. सोमेंदुवर खोटारडेपणाचा शिक्का मारत म्हणाला, “खोटारडा आहेस तू. चोरांनी नाही, मीच बडवला होता तुला. तुझं ते टोपडं चेपलं मी, तुझं टक्कुरं फोडलं मी. पण त्या वर्तमानपत्रवाल्याकडं चोरांशी झटापट करून शौर्य गाजवल्याची फुशारकी मारलीस.”
 
“आज सकाळी सकाळी हातभट्टीची मारलीस काय रे? जा गप घरात.”
 
“म्हणजे? शिपुरड्या, तुला काय म्हणायचंय? मी नाही बडवलं तुला?”
 
सोमेंदु जवळ आला आणि बिधनच्या डोळ्याला डोळा भिडवून शांतपणे म्हणाला, “तू काय बोलतो आहेस तेच मला समजत नाही.”
 
बिधन काही तरी बोलणार होता इतक्यात सोमेंदु पुढं बोलला, “हां, आता त्या तीन चोरांपैकी जाडाजुडा असलेला चोर तू असलास तर शक्य आहे. मला त्याचा आणि तुझा आवाजही एकच वाटतोय. बोल. तू होतास तो? सांग म्हणजे आत्ताच्या आत्ता तुला चौकीत नेऊन गुदरतो.”
 
हळूहळू बिधनच्या बथ्थड डोक्यात प्रकाश पडायला लागला. सोमेंदु हवालदार पुढं म्हणाला, “तुझ्याच उंचीचा होता तो. म्हणजे बघ, ठरव काय ते नक्की…..आणि हो, तुझ्या भल्यासाठी सांगतो, तू आता माझ्याकडं जे बोललास ते दुसऱ्या कुणाकडं बोलशील तर गोत्यात तूच येशील.”
 

बिधन घाईघाईनं म्हणाला, “नाही, नाही! आईशप्पथ! मी कुणाकडं काही बोलणार नाही.”
 
“म ठीक आहे. तसंही मला माझ्या शेजाऱ्याचं काही वाईट करायचं नाही आहे. पण अरे हो, तू काही इथून पुढं माझा शेजारी नसणार आहेस म्हणा.” हवालदार बोलला.
 
“म्हणजे?” बिधननं बुचकळ्यात पडून विचारलं.
 
“म्हणजे असं, की आता मला या साधारण वस्तीत तुझ्यासारख्या दीड दमडीच्या माणसाच्या शेजारी रहायची गरज नाही. त्या रात्री दाखवलेल्या शौर्याबद्दल मला बढती मिळाली आहे असिस्टंट सबइन्स्पेक्टर म्हणून. गुप्ता कॉलनीतला सरकारी फ्लॅटही दिलाय मला. आणि हो, तुझा आभारी आहे मी बिधन पाल. तू आणि ती चोरी, यामुळंच मला ही बढती इतक्या लवकर मिळाली. नाहीतर वर्षानुवर्षं वाट बघायला लागते लोकाना.”
 
कुत्सितपणानी हसत हवालदार….छे, छे, असिस्टंट सबइन्स्पेक्टर…. सोमेंदु दासगुप्ता घरात शिरला. बिधन पाल अवाक् होऊन बघतच राहिला.
*****

 (कथेतील पात्रांचे बंगाली संभाषण लिहिण्यासाठी माझा बांगलादेशी मित्र झोमीर अली याने मदत केली. त्याला ‘धोन्नोबाद’ देतो.)