Sunday, August 25, 2019

-१०- मरळ मासा


(अंतोन चेकॉव्हच्या The Fish या कथेचे मुक्त मुक्त रुपांतर)

वाघवणे गाव. उन्हाळ्यातली फाटफट (सकाळ). वारा पडला होता. कर्ली नदीच्या काठाला गवतात टोळांची किर्रकिर्र, पाण्याची चुळुकचुळूक आणि एखाद्या चुकार कबुतराची गुटुर्रगू यांच्याशिवाय दुसरा कसला आवाज येत नव्हता. पांढऱ्या ढगांची कापसाची गाठोडी आकाशात उगीचच निर्हेतुक तरंगत होती...... भार्गवराम - उंच, वाळकुड्या अंगाचा, लालसर कुरळ्या केसांचा आणि तोंडभर दाढीमिश्यांचे खुंट वाढलेला - भार्गू सुतार, नदीच्या काठाशी पण पाण्यात, वाढलेल्या झुडपांच्या मुळांशी हात खुपसून  काही तरी पकडून धरायचा प्रयत्न करत होता. होता पाण्यात, तरी पण त्याचा चेहरा घामाने तर्र झालेला होता. त्याच्यापासून पाच सहा फुटांवर तिकोनी चेहरेपट्टीचा, मिचमिच्या डोळ्यांचा, पोरगेलासा, कुबडा सुतार रवळनाथ ऊर्फ रवळू जवळजवळ गळ्यापर्यंतच्या पाण्यात उभा राहून एकनाथाकडे बघत होता. भार्गू आणि रवळू, दोघेही गेला अर्धा पाऊण कलाक पाण्यात होते.  

भार्गवा, पान्यात चाचपतंस कित्याक ? (भार्गवा, पाण्यात चाचप्तोस काय?) कुबडा रवळू केकाटला. आवशीचो घोव, अरे, पकरुन धर, पकरुन धर तेका. नायतर पलून जावचो शिंचो. हांव उलयतां हां तुका. पकर, पकर” (च्यायच्चा ! पकडून धर, पकडून धर त्याला. नाहीतर शिंचा पळून जाईल, मी सांगतो तुला.) 

नाय जावचा. कसा जायल? झाडाच्ये मुळात अडकडलो ना?” (नाही जाणार. झाडाच्या मुळ्यात अडकलाय ना) भार्गवराम बेंबीच्या देठापासून काढल्यासारखा आवाज काढून म्हणाला, “बुळबुळीत आसा. मायझया नीट पकडूकच हातात काय नाय ना.” (बुळबुळीत आहे. च्यायला पकडायला हातात काही नाही न) 

“अरे, कल्ल्यात हात घालून पकर रे.” (अरे कल्ल्यात हात घालून पकड ना)  

कल्लो गावत नाय. दम धर, गावलो रे, गावलो काय तां पकरायला... तोंडच आसा भवतेक. हय. ओठ आसा. धरलंन काय! च्च्या... आवशीचो घो. चावता रे.” (कल्लाच सापडत नाही. थांब, सापडलं काही तरी पकडायला. तोंडच असेल बहुतेक. ओठ आहे. धरलं बघ. च्च्या... च्यायला, चावतोय रे.) 

ओठाक धरून ओढू नको. सुटून जातला. जरा बाजूक हात कर. कल्लो सापडतलो तुका. हट, मेल्या, लागलंस पुन्हा चाचपाक ! तुझ्या आयशीचो घो ! सोडलंय वाटतां? पकर पुन्हा.”  (ओठाला धरून ओढू नको. सुटून जाईल. जरा बाजूला हात कर. कल्ला सापडेल तुला. हात् मेल्या ! लागला परत चाचपायला. हात्त् तुज्याssयला ! सोडलास वाटतां. पकड पकड पुन्हा) 

अरे, रवळ्या, मेल्या, कुबड्या, थंयसर उबो रवतंस आणि माका सांगतंस ? चल ये हंयसर आनि पकर बग तेंका. (रवळ्या, मेल्या, तिथं उभा राहतोस आणि मला सांगतोस? ये इथं आणि पकड बघू त्याला) 

माका जमला असतां तर इलो असतो. पन तुका ठाव आसा, माजी उंची किती ? दीड फूट. थंय उबो कसो रवनार. बुडूचो नाssय ?  (मला जमलं असतं तर नक्की आलो असतो. पण तुला ठाऊक आहे. माझी उंची किती? दीड फूट? तिथं उभा कसा राहणार? बुडणार नाही का मी?)  

बुडतंय कित्याक ? मेल्या तुका पवुक येना नाय ? माका गजाली सांगतंस ? (बुडतोस कशानं? तुला पोहायला येत नाही. बाता नको ठोकू) 

रवळूनं हात झटकले आणि पोहत भार्गवाजवळ पोचला. झुडपाची खाली आलेली एक फांदी धरायच्या प्रयत्नात धडपडला आणि पाण्यात एक गटांगळी खाऊन वर आला. 

मिया बोललंय होतंय तुका पाणी जास्तच खोल आसा म्हणून.”  (मी बोललो होता तुला पाणी जादा खोल आहे म्हणून) तो म्हणाला. “आता ! मिया तुजे खांद्यार उबो रवू काय?” (आता ! मी काय तुझ्या खांद्यावर उभा राहू काय?) 

ये. हायसर ये. झाडाच्या मुळांची शिडी झालीसा हयसर. तिच्येर उबो रव आन् ही फांदी घट पकड.” (“ये. इथवर ये. झाडाच्या मुळयांची शिडी झाली आहे इथं. तिच्यावर उभा रहा. आणि ही फांदी घट्ट पकड.”) भार्गवानं त्याला हात दिला आणि उभं केलं. ..... तोल सावरत रवळू  कसाबसा उभा राहिला आणि पाण्यात वाकून झाडाच्या मुळाशी हात घालून चाचपायला लागला. मुळांच्या जाळीत आणि बुळबुळीत चिखलात त्याच्या हाताला चिंगुळी माशाच्या -क्रे फिश- टोकदार नांग्यानी पकडलं. जल्ला तुजा लक्षण मेल्या. मिया काय तुका भेटूक आयलंय तुका रे हैवाना?  (जळ्ळं मेलं लक्षण तुझं. मेल्या, मी काय तुला भेटायला आलो होतो काय रे हैवाना?) म्हणत रवळूनं हात झटकून चिंगुळीला काठावर भिरकावलं. 

या साऱ्या धडपडीत एकदाचा रवळूच्या हातानं पाण्यातल्या भार्गवाच्या हाताला धरून चाचपत काही तरी मऊ पण बुळबुळीत गोष्टीला स्पर्श केला.  

सापडलो रेss”..... (सापडला बघ) रवळू ओरडला.. “भार्गवा, हो बाजूक तू. मिया खेचतंय तेका कल्ल्यात हात घालून. एक मिंटात भायेर काढतंय बघ. जरा माका पक्को धरू दी तेका.” (“भार्गवा, हो बाजूला तू. मी खेचतो त्याला कल्ल्यात हात घालून. एक मिनटात बाहेर काढतो बघ. जरा मला पक्कं धरू दे त्याला) …. आवशीचो... पोटकुळी लागतासा रे हाताक. अजून धरूक काय गावात नाय रे. भार्ग्या, माज्या मानेर बसलेली माशी हाकाव मरे. चावतासा माका. हांग आश्शी ! वायच बाजूक सर नि माशयेक तुज्या बोटान ढोस, मगे हांव तेका खेचतंय भायेर.” (....आयशीचा....  पोटकुळी लागतेय रे हाताला. अजून धरायला काय सापडत नाही. भार्गवा, अरे माझ्या मानेवर बसलेली माशी हाकल रे. चावतेय मला. हं. ठीक आहे! जरा बाजूला सरक नी माश्याला तुझ्या बोटानं ढोस. मग मी त्याला खेचतो बाहेर.) 

कुबड्या रवळूला बहुतेक माशाचा कल्ला सापडला असावा. त्यानं गाल फुगवले, श्वास रोधून धरला आणि माश्याला बाहेर खेचायचा प्रयत्न केला. पण डाव्या हातात धरलेली काठावरच्या झुडपाची बारकीशी फांदी कटकन तुटली आणि रवळू स्वत:च धप्पदिशी पाण्यात पडला. त्याच्या पडण्यामुळं पाणीच जसं काही घाबरलंय अशा लाटा निर्माण झाल्या आणि त्याच काठाला थडकून उलट्या रवळूला प्रवाहात घेऊन निघाल्या. कसाबसा पाण्याच्या वर येऊन पोहत तो बाजूला झाला.  

“हो बाजूक. नाय तर बुडून मरशील तू आन् माका लागात निस्तरूक !” (हो बाजूला. नाही तर बुडून मरशील नि मला निस्तरावे लागेल) भार्गवरामानं दम भरला, “सरक थंयसर. मियाच कायतरी करतंय. मगे काय!” (सरक तिकडे. मीच काही तरी करतो, मग काय!) 

शब्दानं शब्द वाढला. फाटफट (सकाळ) सरून दोंपार (दुपार) व्हायला लागली. सावल्या लहान लहान होत आपल्यातच मिसळून जायला लागल्या. काठावरच्या उंच वाढलेल्या गवतातून तापल्यामुळं एक वेगळाच वास यायला लागला, मधासारखा. दुपार व्हायला लागली. पण अजूनही भार्गव आणि रवळू पाण्यातच होते त्या माशाचा पिच्छा पुरवत. गवतावरून वाहणाऱ्या वाऱ्याची आलटून पालटून खर्ज आणि तीव्र अशा दोन्ही सुरावटीतली शीळ साथीला होती. 

“रे भार्गवा, कल्ल्यात दोन बोटा घालून खेच तेका भायेर.” (भार्गवा, अरे कल्ल्यात दोन बोटं घालून खेच त्याला बाहेर.) 

रवळ्या, काय करतंस? मेल्या, कित्याक जातंस. थंय कोंड आसा. मात्शे हंय सर” (रवळ्या, मेल्या, काय करतोस? उजवीकडं कशाला जातोयस? तिथं डोह आहे. थोडंस इकडे सरक.) 

नदी काठावर चाबूक फटकावल्याचा आवाज झाला. धाकू गुराखी येत होता जनावरं घेऊन. धाकू तसा म्हाताऱ्यातच गणला जायचा, एक डोळा असलेला आणि वाकड्या तोंडाचा. पहिल्यांदा चार शेळ्या आल्या पाण्यावर, त्यांच्या मागून तीन म्हसरं आणि एक गाय. धाकू आपला खाल मुंडी नि पाताळ धुंडी असा येत होता. 

“भार्गू, रे पोटांत बोट ढोसून खालनं वर ढकल तेका. ऐकूक येणा नाय रे तुका ? (भार्गू, अरे पोटात बोट ढोसून खालनं वर ढकल त्याला. ऐकू येत नाही काय तुला ?) धाकूच्या कानावर रवळूचे हे शब्द पडले नि त्यानं मान वर करून बघितलं. 

“काय करता रे पोरानू ?(काय करता रे पोरानो?) त्यानं विचारलं. 

“मोठठो मरळ मासो आसा. आमच्यान् निघुचो नाय. मुळ्यांच्या भितुर घुसलोसा.” (मोठ्ठा मरळ मासा आहे. आमच्याच्यानं निघत नाही. मुळ्यांच्या आत घुसून बसलाय.) 

धाकूनं बोलणाऱ्याकडं आपला एकुलता एक डोळा फिरवून मिनिटभर बघितलं, खांद्यावरची पडशी खाली टाकली, सदरा काढला, पायातल्या वहाणा काढल्या आणि पाण्यात शिरला. गाळातून दहा पाच पावलं चालत आणि मग पोहत तो त्या दोन मच्छीमार सुतारांजवळ जाऊन पोचला. 

थांबा रे पोरांनु,(थांबा रे पोरानो,) तो ओरडला. “घाई करू नुका तेका भायेर काढूची. घाईघाईत काय तरी करात आन मासो जाल निसटान्. (थांबा. घाई करू नका त्याला बाहेर ओढायची. घाईघाईत काही तरी कराल नि मासा जाईल निसटून.) 

आणि धाकूही त्या दोघांबरोबर माश्याच्या मागं लागला. तिघंही एकमेकाला ढकलत, शिवीगाळ करत माशाला बाहेर काढायचा निष्फळ प्रयत्न करायला लागले. त्यात रवळूचं डोकं पुन्हा एकदा पाण्याच्या खाली जाऊन वर आलं. त्याच्या खोकून तोंडात गेलेलं पाणी काढण्याचा आवाज वातावरणात भरून राहिला. 

काठावरून आरोळी आली, “खंय उलथलो शिंचो गुराखी? धाक्या, मेल्या खंय मराक गेल्लंस? गुरां शिरली ना वावरांत. काढ भायेर तेंका अगुदर. खंय उलथलंस मायझया?(कुठं उलथला शिंचा गुराखी?  धाक्या, मेल्या कुठं गेलास मरायला? गुरं शिरली ना वावरात. काढ बाहेर काढ त्याना आधी. कुठं उलथलायस मायझया?) पहिल्यांदा हा पुरुषाचा आवाज होता. नंतर एक बाईही तसंच ओरडली. 

हा सगळा आरडाओरडा ऐकून पायजमा आणि बिनबाह्यांचा कळकट जाळीदार बनियन या अवतारातला  आचरेकर ‘देवबाग समाचार’ वर्तमानपत्राची सुरळी  हातात धरून घरातून बाहेर आला. हा वावरातल्या वाड्याचा मालक. भार्गव आणि रवळू या दोघा सुताराना माडांच्या सावलीत न्हाणीघरासाठी शेड उभारायचं कंत्राट दिलं होत या आचरेकरानं. नदीच्या पात्रात चाललेल्या झटापटीचा कानोसा घेऊन  त्यानं शेडचं काम कुठवर आलंय ते बघितलं आणि त्याचं पित्त खवळलं. 

काय चल्लासा रे? का बोंबलतंय आन आपली कामा सोडून काय पवतासा की काय पाण्यांत ? मेल्या, तुजी गुरां अगुदर वावरतं भायेर काढ आन रे सुतारानु, रे माजा शेडाचा काम कंदी पुरा करतलात?  (काय चाललंय रे?, का बोंबलता? आणि आपली कामं सोडून काय पोहता की काय पाण्यांत? धाक्या, मेल्या, तुझी गुरं आधी वावरातनं बाहेर काढ आणि रे सुतारानो, अरे माझं शेडचं काम कधी पुरं करणार?) 

म्हावरा धरतां सावकारानू, मोठठो आसा.” (मासा पकडतोय मालक. मोठ्ठा आहे) भार्गव सुतार ओरडला.   

दोन दिसांसून काम करतत न् अजून शिरां पडल्या नसा छपराक. आन् आता काम सोडून थंयसर म्हाव-याच्या मागं लागलां रांडेच्यांनो? फटकेचो  वाको यील तुमका.” (दोन दिवसांपासून काम करता आहात आणि अजून छपरावर झावळी घातल्या नाहीत. आणि आता काम सोडून तिथं माश्यांच्या मागं लागलात काय रे रांडेच्यानो? पटकी होईल तुम्हाला.)  

सावकारानू, दोन दिसांत काम पुरा होतला. चिंता नोको करू. या म्हाव-याच्या आवशीचो घोव ! सावकारानू, माहित काय ? चांगली मरळ आसा, मोठ्ठी थोरली. मुळ्यात गुतली ना ! आमच्यान् काय भायेर येतासा नाय बघ. (मालक, अजून दोन दिवसात काम पुरं होईल बघा. काळजी करू नका. च्या मारी या माश्याच्या आयशीचा घो. मालक, चांगली मरळ आहे हो. मोठ्ठी. मुळ्यात गुंतून पडलेय ना! आमच्याच्याने काय बाहेर निघेना बघा.)  

मरळ म्हणाल्यावर आचरेकराचे डोळे मोठ्ठे झाले. “काय म्हणतंस ? मरळ ? आरे मगे काढ तेका भायेर बेगिन.” (काय म्हणतोस? मरळ? अरे मग काढा तिला बाहेर लवकर) 

“मगे ? तांच तर करतत ! रे धाकू, मरळीक दाबू नुको. मारशील तेका मेल्या. मुळयो वर कर. आन मरळीक खालसून हात घालून ढकल. वरसुन खाली नाय. खालसून वर ढकल.” भार्गवनं धाकू गुराख्याला झापलं. (मग? तेच तर करतोय! धाकू, अरे मरळीला दाबू नकोस. मारशील तिला मेल्या. मुळ्या वर कर आणि खाली हात घालून मरळीला खाली हात घालून ढकल. वरून खाली नाही, खालून वर ढकल) 

पाच मिनिटं झाली. दहा झाली. आता आचरेकरालाही दम निघेना. त्यानं वावरात असलेल्या मुलीला हाक मारली, “वच्छे, चेडवा, गो, पुरशा गाडीवानाक सांग मिया बोलावतंय म्हणून. बेगीन ये म्हण.” (वच्छे, मुली, जा पुरशा गाडीवानाल सांग मी बोलवलंय म्हणून. लगेच ये म्हणाव.)  

पुरषोत्तम, आचरेकराचा गाडीवान धापा टाकत पळतच आला. 

(“पाण्यात उतर पुर्षा, जा मदत कर या बिनकामाच्या माणसांक एक मरळ धरूक येणा नाय रांडेच्यांक.” (“पाण्यात उतर पुर्षा. जा मदत कर या बिनकामाच्या माणसाना. एक मरळ धरता येईना रांडेच्याना.”) 

पुरषोत्तमानं पटकन् कपडे काढले आणि पाण्यात उतरला. “एक मिन्टात काढतंय तेका भायेर. बगत रवा मालकानु (एक मिनटात काढतो तिला बाहेर. बघत रहा मालक). कुठशीक आसा रे मरळ ? भितर ? रे भार्ग्या, म्हाताऱ्या, तू हो वर. तुज्याच्यान होवचा नाय. तू आपलां तुजा छपरीचा काम सांबाल जा. मिया काढतंय बग तेका झटक्यात. एक मिनिट मिनिट बास आसा माका. आली बग हाताशी.   (रे भार्ग्या, म्हाताऱ्या, तू हो वर. तुझ्याच्यानं नाई व्हायचं हे. तू आपलं तुझं छपरीचं काम सांभाळ. जा. मी काढतो बघ तिला झटक्यात. एक मिनिट, एक मिनिट बास आहे मला. हां. आली बग हाताशी.)   

“तां आमका सगळ्यांक ठाव आसा. बोलत नुको रव. तेंका भायेर हाड नि मंग बोल” (ते माहित आहे आम्हा सगळ्यांनाच. आता बोलत नको राहूस. आधी तिला बाहेर काढ आणि मग बोल)  

तशी नाय येवची ती भायेर. बोडूक धरूक होया.” (तशी नाही येणार ती बाहेर. डोकं धरायला हवं तिचं) 

तां ठाव आसा आमका. न् तेचा बोडूक पन आसा मुळ्याभितुर तां सुदिक.” (ते ठाऊक आहे आम्हाला. आणि डोकं मुळ्यांत आहे ते सुध्दा ठाऊक आहे.) 

, तू चीप रव रे. नायतर तू हाड तेंका भायेर. जमूचा तुका ?(ए, तू गप रहारे. नाहीतर तूच काढ तिला बाहेर. जमेल तुला?) 

आचरेकराचा पारा ही त्यांची आपापसातली बोलाचाली ऐकून चढला. “तुमच्या आवशीचो घोव हलकटानो. आता तुमी सगरे चीप रवा. हांव येतंय थंय (तुमच्या आयशीचा घो, हलकटानो. आता तुम्ही सगळे मुकाट बसा. मी येतो तिथं) आणि त्यानं कपडे उतरवले. “चार चार मानसा नि एक मरळ भायेर येणा नाय त्यांच्याच्यान्.” (चार चार माणसं नि एक मरळ बाहेर निघेना त्यांच्याच्यानं!) 

कपडे उतरून आचरेकर पाण्यात उतरला. दोन्ही हातानी अंगावर पाणी उडवून, चोळून अंग गार करून घेतलं आणि मग त्या चौघांजवळ जाऊन पोचला. पण त्याच्या प्रयत्नानाही यश आलं नाही. तेव्हा भार्गव म्हणाला, 

माका काय वाटतां सावकारानू, झाडाची मुळा कापुक होयी. रे रवळु, जा वर न् आरी घिऊन ये.” (मला काय म्हणायचय मालक, झाडाच्या मुळ्या छाटायला पाहिजेत. रवळू, वर जा आणि करवत घेऊन ये.) 

रवळूनं करवत आणली आणि भार्गवाकडे दिली.  

सांबाळून रे भार्ग्या, नायतर तुजीच बोटां छाटशीत. नकोच तुका. तू हो बाजूक. मिया बगतंय.” (सांभाळून रे भार्ग्या. नायतर तुजीच बोटं छाटशीत. नकोच ते. तू हो बाजूला. मी बघतो.) आचरेकर बोलला. 

झाडाचं मूळ जरासं छाटण्यात आलं. आचरेकराच्या बोटाना मरळीच्या मऊ पोटाचा स्पर्श झाला आणि त्यांनी तिच्या कल्ल्याना हात घातला. 

हां, बगा आत्ता मिया ओढून काढतंय तेका भायेर. तुमी सगले व्हा दूर जरा.”  (हां. बघा आता मी ओढून काढतो तिला बाहेर. तुम्ही सगळे व्हा दूर जरा.) आचरेकर बोलला. मरळीचं डोकं आणि त्याच्या मागे जवळजवळ अडीच तीन फूट लांबीचं शरीर बाहेर आलं. मरळीनं पाण्याला शेपटाचे जबरदस्त तडाखे मारत आचरेकराच्या हातातून सुटायचा प्रयत्न चालू केला. “बास बास, माजे बाय. किती फडफडतंस ? मी आता तुका सोडूचंय नाय ह्यां पक्का.” (बस् बस् माझे आई,  किती फडफडतेस? मी काही आता तुला सोडणार नाही हे नक्की) आचरेकर तिच्याकडे रोखून बघत म्हणाला.  

सगळ्या ‘मच्छिमारांचे’ चेहरे आनंदानं फुलून आले.  

किती मोठठो थोरलो आसा नाय ?(किती मोठ्ठी आहे ना? ) भार्गव आपले खांदे चोळत म्हणाला. “हांव पैजेर सांगतंय सावकारानू, पाच किलोच्या खाली नसा ! कितें ? रवळू? (मी पैजेवर सांगतो मालक, पाच किलोच्या खाली नाही! काय म्हणतोस रवळू?)  

“हां. आन धपापतासा कशी ? पॉट बग... पॉट बग तेचा. पाचशयाच्या वर पोरां असतलीं.” ... (हं ! आणि धपापते कशी ! पोट बघ... पोट बघ तिचं. पाच्श्याच्या वर पोरं असणार.) आचरेकरानी समाधानानं आपलं निरिक्षण सांगितलं. “आवशीचो घोव तेच्या, अर्रर्र..... अर्रर्र.....” (आवशीचा घोव तिच्या, आर्र... आर्र.....) 

मरळीनं जीवाच्या आकांतानं एकवार शेपटीचा तडाखा हाणला आणि अंगाला वळसे देत सफाईनं आचरेकराच्या हातातून उसळी घेतली.  सगळ्यानी तिला झेलायसाठी हात पसरले पण.....

‘सुळुक्’. 

मरळीचं तेच शेवटचं दर्शन !
*****

**या कथेतील संवाद माझे स्नेही श्री मंगेश नाबर यांनी मालवणी भाषेत रूपांतरित करून दिले आहेत. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

 

 

 

No comments:

Post a Comment